पुणे : वारजे परिसरातील वाढती लोकसंख्या आणि वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सहयोगनगर, वारजे येथील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात येत आहेत. दिलीपभाऊ बराटे यांच्या पुढाकारातून तसेच भारतभूषण बराटे यांच्या यशस्वी प्रयत्नांमुळे वारजेकरांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
दिलीपभाऊ बराटे सरपंच असताना ग्रामपंचायत काळात उभारण्यात आलेल्या सहयोगनगर येथील जलशुद्धीकरण केंद्राची मूळ क्षमता साधारण १० MLD इतकी आहे. मात्र सध्या या केंद्रावर १२.५ ते १३ MLD क्षमतेने ताण पडत असून तब्बल २२ ते २३ तास केंद्र सुरू ठेवून वारजेगाव, रामनगर, संपूर्ण माळवाडी, कॅवनसाईट सोसायटी, गणपती माथा, सहयोगनगर-गोकुळनगर, गणेशपुरी तसेच अहिरेगाव या भागांना पाणीपुरवठा केला जात आहे.
मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे भविष्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन या केंद्राची जलशुद्धीकरण क्षमता दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी आज दिलीपभाऊ बराटे, महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि तज्ज्ञ सल्लागार यांनी सहयोगनगर केंद्र तसेच गणपती माथा परिसराची जागा पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
या प्रकल्पामुळे आगामी ३० वर्षांचा विचार करून वारजे परिसरातील पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विकासकामांचा धडाका कायम ठेवत नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.









