जवळके गावातील पाणीटंचाईच्या समस्येवर अखेर तात्काळ तोडगा!

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील जवळके स गावातील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. गावातील पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या लक्षात घेऊन प्रशासनाकडे करण्यात आलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

जवळके गावातील पाणीटंचाईच्या प्रश्नासाठी निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघ, वन्दे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज आणि समृद्ध भारत यांच्या वतीने विशाल बाळासाहेब अडागळे यांनी प्रशासनाकडे तातडीने पाठपुरावा केला.

या पाठपुराव्याची दखल घेत तहसीलदार शितलकुमार सवाळे, गटविकास अधिकारी शुभम जाधव, प्रांत अधिकारी नितीन पाटील, प्रथम नागरिक सुभाष दादा माने, ग्रामसेवक मोकाशी, महसूल अधिकारी शिरसाट, तसेच काशी केदार आणि असिफ सय्यद यांच्या सहकार्याने अवघ्या एका दिवसात टँकरचा प्रश्न मार्गी लागला.

आज १३ सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पाण्याचा टँकर जवळके गावात पोहोचला. त्यानंतर शासकीय विहिरीमध्ये पाणी सोडण्यात आले.

विशेष म्हणजे, आजपासून जवळके गावात दररोज पाणी टँकरची सुविधा सुरू राहणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त असलेल्या ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, या तात्काळ मदतीबद्दल जवळके ग्रामस्थांनी प्रशासनासह पाठपुरावा करणाऱ्या आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.

पाणीटंचाईच्या गंभीर प्रश्नावर अवघ्या एका दिवसात झालेली ही कार्यवाही ग्रामस्थांसाठी दिलासादायक ठरली आहे.

Leave a Comment

Traffic Tail