व्याहळी, दि. १३ : एखाद्या व्यक्तीचे आयुष्य किती वर्षांचे होते, यापेक्षा त्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात किती माणसे जोडली, किती चेहरे हसवले आणि समाजासाठी किती चांगले कार्य केले, यालाच खरे महत्त्व असते. काही व्यक्ती काळाच्या पडद्याआड जातात; मात्र त्यांचे विचार, त्यांचा जिव्हाळा आणि समाजसेवेची प्रेरणा अनेकांच्या कृतीतून कायम जिवंत राहते. अशाच कै. अजय दिगंबर थोरवे यांच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त मोरया रे ग्रुपच्या वतीने व्याहळी कॉलनी येथील श्री काळभैरवनाथ मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरातून त्यांच्या स्मृतीला अनोखी मानवंदना अर्पण करण्यात आली. सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत ५० रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपली.

मनमिळावू स्वभाव, मित्रांसाठी नेहमी धावून जाण्याची वृत्ती आणि समाजकार्याची प्रामाणिक आवड यामुळे कै. अजय थोरवे यांनी अल्पायुष्यातच अनेकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले होते. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबासह संपूर्ण व्याहळी परिसरावर दुःखाची छाया पसरली. मात्र, त्यांच्या स्मृती केवळ आठवणींपुरत्या मर्यादित न राहता समाजासाठी प्रेरणादायी ठराव्यात, या उदात्त भावनेतून सुरू झालेला रक्तदानाचा उपक्रम आज अनेक गरजू रुग्णांसाठी जीवनदानाचा आधार ठरत आहे.
मागील सात वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या या उपक्रमाला यंदाही युवक, नागरिक आणि मित्रपरिवाराचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एका रक्तदात्यामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते, या सामाजिक जाणिवेतून रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविला. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचा आयोजकांच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोरया रे ग्रुपच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. यावेळी कै. अजय थोरवे यांचे मोठे बंधू निलेश थोरवे यांनी सांगितले की, “अजयच्या स्मृतीप्रित्यर्थ सुरू झालेला हा समाजोपयोगी उपक्रम भविष्यातही दरवर्षी अधिक व्यापक स्वरूपात आणि त्याच सेवाभावाने राबविण्यात येईल.” “माणूस निघून जातो; पण त्याच्या स्मृतीतून समाजासाठी घडणारी सत्कर्मेच त्याला खऱ्या अर्थाने अमरत्व देतात,” हा संदेश देणारे हे रक्तदान शिबिर वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरले.









