पुणे, प्रतिनिधी (उमेश अहिरे):
महाराष्ट्राची समृद्ध संतपरंपरा, वारकरी संस्कृती आणि भक्तीचा संदेश बालवयातच विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबावा, या उद्देशाने येथील ‘कल्पतरू प्री-स्कूल’मध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक महाराष्ट्रीयन वेशभूषा परिधान करून दिंडीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. पालकांनी सुद्धा या सोहळ्यात मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवल्याचे दिसून आले. आपल्या लाडक्या पाल्यांना नटवून-थटवून, पारंपरिक वेशभूषेत अत्यंत आनंदाने त्यांनी शाळेत पाठवले होते. बालवारकऱ्यांच्या हातातील भगवे ध्वज, तुळशीची रोपे, वीणा, टाळ आणि मृदंग सर्वांचेच आकर्षण ठरले होते. विठूनामाचा गजर, अभंग आणि जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत नामदेव आणि संत एकनाथ या थोर संतांच्या वारकरी परंपरेची ओळख करून देण्यात आली.
तसेच भक्ती, एकता, शिस्त आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे महत्त्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकायला मिळाले. ”पुस्तकी ज्ञानासोबतच संस्कार आणि संस्कृतीची ओळख करून देणे ही शाळेची जबाबदारी आहे. पालखी सोहळ्यासारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भक्तीभाव, शिस्त, सहकार्य आणि सामाजिक ऐक्याची भावना निर्माण होते. पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच हा सोहळा संस्मरणीय ठरला. आमच्या शाळेत वर्षभर सर्व सण, उत्सव आणि महापुरुषांची जयंती अशाच उत्साही वातावरणात साजरी केली जाते.” — प्रा. अनुजा माने (प्राचार्या, कल्पतरू प्री-स्कूल) या भक्तिमय आणि संस्कारक्षम उपक्रमाचे पालकांनी विशेष कौतुक केले. चिमुकल्यांच्या आणि पालकांच्या उत्साही सहभागामुळे हा सोहळा अत्यंत देखणा आणि यशस्वी ठरला, ज्याबद्दल परिसरातील नागरिकांनीही मोठा आनंद व्यक्त केला.









